नवी दिल्ली - ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी आज काँग्रेसला राजीनामा दिला आहे. आता जम्मू-काश्मीरमधील दिग्गज नेते असलेल्या गुलाम नबी आझाद यांनी आपल्या पुढील राजकीय वाटचालीविषयी मोठी घोषणा केली आहे.
गुलाम नबी आझाद यांनी सांगितले की, आता मी जम्मू-काश्मीरमध्ये परतणार आहे. तसेच तिथे मी माझ्या नव्या पक्षाची स्थापना करणार आहे. माझे विरोधक गेल्या तीन वर्षांपासून मी भाजपामध्ये जाणार असल्याच्या वावड्या उठवत आहेत. तसेच त्यांनी मला राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीही बनवून टाकले होते, अशी टिप्पणी आझाद यांनी केली.
दरम्यान, गुलाम नबी आझाद यांनी आज काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देण्याची घोषणा केली. त्यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पाच पानांचं पत्र लिहून आपल्या मनातील खदखद व्यक्त केली.