अकोला : पंचायत समिती निवडणुकीसाठी ५ लाख रुपये माहेरकडून आणण्यासाठी तगादा लावला होता. याला कंटाळून या महिलेने आत्महत्या केल्याची नातेवाइकांचे आरोप आहेत. तसेच, या प्रकरणात सासरच्या मंडळींवर उरळ पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल असून तिच्या पतीला अटक केली आहे.
नंदा रामदास साबळे (वय ४५ रा. मांजरी, अकोला) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २६ एप्रिल २०२१ रोजी जयश्री हिचा विवाह पैलपाडा येथील आशिष वसंतराव नागे यांच्यासोबत झाला. आशिष एका खाजगी व्यवसाय करतो. तर सासरचेही राजकीय क्षेत्रात आहे. दरम्यान, सुरुवातीला सासरच्यांनी जयश्री नागे यांना चांगले वागविले. काही दिवस गेल्यानंतर सासरच्यांनी पती आशिष वसंतराव नागे आणि सासर मंडळींनी तिला शारीरिक व मानसिक त्रास द्यायला सुरुवात केली.गेल्या काही दिवसांपासून जयश्री नागे यांना निवडणुकीसाठी ५ लाख रुपये माहेरकडून आणण्यासाठी तगादा लावला होता. माहेरकडील आर्थिक परिस्थिती ठीक नसतानासुध्दा जयश्री हिने २ लाख ५० हजार रुपये सासरी आणून दिले. मात्र, त्यानंतर तिचा छळ कमी होईल आणि पुन्हा सर्व सुरळीत होईल, असे वाटले होते. परंतु, पुन्हा उर्वरित २ लाख ५० हजार रुपयांसाठी तिचा प्रचंड मानसिक व शारीरिक छळ सुरू होता. तर पती आशिष नागे ती माहेरी गेली असतानासुध्दा मोबाइल फोनद्वारे पैसे आणण्यासाठी धमक्या देत होता.
दरम्यान, आपल्या मुलीने आत्महत्या केल्याची तक्रार उरळ पोलिस स्टेशनमध्ये दाखल झाली. या तक्रारीनुसार सासरच्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत. पती आशिष याला पोलिसांनी अटक केली आहे.