नवी दिल्ली: एका बनावट आयटी कंपनीने तब्बल 100 हून अधिक लोकांची फसवणूक केली. या लोकांना “परदेशात नोकरी देतो” असं म्हणत म्यानमारला नेण्यात आलंय. यातून आतापर्यंत 32 भारतीय नागरिकांची सुखरूप सुटका करण्यात आली.
आयटी नोकरी मिळण्याच्या बहाण्याने म्यानमारच्या दुर्गम भागात या इच्छुक उमेदवारांना नेण्यात आले. याच भागात अडकलेल्या 60 जणांच्या मदतीसाठी भारत सध्या थायलंड आणि म्यानमारसोबत काम करत आहे. अधिकाऱ्यांनी आतापर्यंत 32 भारतीय नागरिकांची सुखरूप सुटका केली आहे.
‘डिजिटल सेल्स अँड मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह’ पदांसाठी भारतीय तरुणांना आकर्षित करण्यासाठी आकर्षक नोकरीची ऑफर दिली जात आहे, असे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले. हे पूर्णपणे बनावट जॉब रॅकेट असून, त्याचा उद्देश तरुणांना जाळ्यात ओढणे हा आहे, अशी माहिती या मिशनला मिळाली आहे. कॉल-सेंटर घोटाळा आणि क्रिप्टो-करन्सी घोटाळ्यांमध्ये गुंतलेल्या संशयित आयटी कंपन्यांकडून हे रॅकेट चालवले जात आहेत.
“बँकॉक आणि म्यानमारमधील आमच्या मिशनच्या लक्षात आले आहे की बनावट जॉब रॅकेट थायलंडमधील ‘डिजिटल सेल्स अँड मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह’च्या पदांवर नियुक्तीसाठी भारतीय तरुणांना आकर्षक नोकरी देत आहेत. बनावट कॉल सेंटर्स आणि क्रिप्टो-करन्सी फसवणुकीत गुंतलेल्या संशयित आयटी कंपन्यांकडून या नोकऱ्यांची ऑफर दिली जात आहे.” असे निवेदनात म्हटले आहे.
दरम्यान, यात बहुतेक लोकांना भारताबाहेर नेण्यात आलंय. बहुतेक लोकांना म्यानमारला नेण्यात आले आहे. त्यामुळे भारतीय नागरिकांना सोशल मीडिया प्लॅटफॉर्म किंवा अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सद्वारे दिल्या जाणाऱ्या अशा बोगस जॉब ऑफरला बळी न पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे.(सौ. tv9 मराठी)