मुंबई: आज सकाळी मुंबईजवळील कल्याण येथे रेल्वेचा अपघात टळला. कर्तव्यदक्ष ट्रॅकमनमुळे हा अपघात टळला. कल्याण जलद डाऊन मार्गावरील रेल्वे रुळाला तडा गेल्याचे लक्षात आल्यानंतर या मार्गावरील लोकल वाहतूक काही काळासाठी थांबवण्यात आली. रेल्वे रुळाला तडा गेल्याने सकाळच्या वेळेस मध्य रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र, प्रवासी सुखरूप होते.
याबद्दल अधिक माहिती अशी कि, रेल्वे रुळाला तडा गेल्याची घटना समोर आली तेव्हा इंद्रायणी एक्स्प्रेस वेगाने येत होती. त्याचवेळी कर्तव्यावर असलेले ट्रॅकमन हिरा लाल आणि मिथुन कुमार यांनी प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेतले. त्याच वेळी 23 वर्षीय मिथुन कुमारने ताबडतोब लाल सिग्नल दाखवत एक्स्प्रेसला थांबवण्याचा यशस्वी प्रयत्न केला. तर, हिरा लाल (वय 26) हे तडा गेलेल्या रुळाजवळ उभे होते. ट्रॅकमनच्या सतर्कतेमुळे मोठा रेल्वे अपघात टळला.
दरम्यान, या मार्गावरील वाहतूक इतर मार्गावरून वळवण्यात आली होती. सकाळी 7.15 वाजण्याच्या सुमारास रेल्वे रुळ दुरुस्त करण्यात आला. मात्र, या बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती.