अमरावती: अमरावतीचे अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाबाबत एक मोठे वक्तव्य केले आहे.
यावेळी आमदार बच्चू कडू म्हणाले की, आपल्यासाठी तळागाळातील प्रत्येक कार्यकर्ता महत्वाचा आहे. आपला पक्ष कसा मजबूत होईल याकडे प्रत्येक कार्यकर्त्याने लक्ष दिले पाहिजे. येणारी जिल्हा परिषद निवडणूक असेल किंवा नगरपरिषद निवडणूक प्रत्येकांनी प्रत्येक उमेदवार आपल्यासाठी महत्वाचा आहे. उद्या जिल्हा परिषद प्रहारच्या ताब्यात आली. आपला एक कार्यकर्ता लाल दिव्याच्या गाडीत बसायला लागला तर ती प्रहार पक्षासाठी अभिमानाची गोष्ट असू शकते. तसेच, जिल्हा परिषद सदस्य असो किंवा नगरपरिषदेचा नगरसेवक प्रत्येकजण प्रहारसाठी महत्वाचा आहे. मी तुम्हांला सांगू इच्छितो प्रहारजवळ जर १० आमदार असते, वेळ जर थोडी अधिक बदलली असती, तर येणारा मुख्यमंत्री सुद्धा प्रहारचाच राहिला असता, असे बच्चू कडू यांनी वक्तव्य केले.
दरम्यान, अमरावतीत आज शेकडो कार्यकर्त्यांनी प्रहारमध्ये प्रवेश केला. या मेळाव्याला संबोधित करताना आमदार बच्चू कडू बोलत होते.