सांगली: 'बारामती पवारांपासून तोडण्याकरता अनेक लोकांनी प्रयत्न केले, बारामतीला अनेकांनी टार्गेट केलं, अनेकांनी खोदून पाहिलं मात्र, कोणालाही पाणी लागलं नाही.बारामतीकर शरद पवारांना सोडणार नाहीत, एखाद्या वेळेस सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र बारामती ही शरद पवारांचीच राहील असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला. तसंच सध्या जे बोललं जात आहे ते भाजपचं प्रचार तंत्रच' असल्याचे वक्तव्य करत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपला टोला लगावला आहे.
दरम्यान, काल बारामती येथे भाजपची संघटनात्मक बैठक पार पडली. या बैठकीदरम्यान बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे विसर्जन करून २०२४ चा पुढचा खासदार भाजपचाच होणार,असल्याच वक्तव्य केले होते. त्यांच्या याच वक्तव्यावरुन पत्रकारांनी जंयत पाटील यांनी प्रश्न विचारला असता त्यांनी प्रतिक्रिया दिली.