मुंबई: राज्यात शिंदे आणि फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर नवीन सरकारने मविआ सरकारच्या अनेक निर्णयात बदल केला आहे. आता शिंदे-फडणवीस सरकारने महाविकास आघाडी सरकारने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना दिलेली १२ राज्यपाल नामनिर्देशित यादी रद्द करण्यासंदर्भात पत्र दिले आहे, अशातच, ही यादी रद्द केल्यास महाविकास आघाडी सर्वोच्च न्यायालयात जाईल असा इशारा कॉंग्रेस नेते विजय वड्डेटीवार यांनी दिला आहे.
कॉंग्रेस नेते माजी मंत्री विजय वड्डेटीवार म्हणाले की, राज्यपालांना मर्यादित अधिकार आहेत. राज्यपालांना दिलेली यादी ही कॅबिनेटच्या मंजूरी नंतर पाठवली जाते, एकदा यादी दिल्यानंतर कारण देऊन फेटाळावी लागते. ती यादी अद्यापपर्यंत राज्यपालांनी फेटाळली नाही, याचा अर्थ ती यादी राज्यपालांच्या अजूनही विचाराधीन आहे. जर ही यादी रद्द केली तर आम्ही न्यायालयात दाद मागू. आमची यादी का रद्द केली? या संदर्भात आम्हाला सर्वोच्च न्यायालयात लढावं लागेल असे वड्डेटीवार यांनी वक्तव्य केले.