मुंबई: राज्यातील सत्तासंघर्षावर आज सुप्रीम कोर्टात महत्वपूर्ण सुनावणी झाली. घटनापीठाच्या ५ न्यायमूर्तींसमोर आजची सुनावणी पार पडली. दरम्यान, सुनावणी सुरू असताना एकनाथ शिंदे यांच्या गटाने एक मोठी खेळी खेळली.
शिंदे गटाचे वकील नीरज कौल यांनी थेट धनुष्यबाण हे चिन्हं गोठवण्यात यावे असा युक्तिवाद केला. मात्र, घटनापीठाने शिंदे गटाचा हा युक्तीवाद मान्य केला नाही. यासंदर्भात निवडणूक आयोग आणि शिवसेनेची बाजू ऐकून घेतली जाणार आहे. त्यानंतरच या प्रकरणावर घटनापीठ सुनावणी देणार आहे.
शिंदे गटाच्या युक्तिवादानंतर चिन्हाचा निर्णय घेण्याआधी आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात निर्णय घ्या, असा युक्तिवाद ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आला. यावर कोर्टाने शिंदे गटाच्या वकिलांना प्रतिप्रश्न करत आतापर्यंतच्या ऑर्डरमध्ये निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीमध्ये काही आदेश दिलेले आहेत का? असं विचारलं. त्यावर लेखी उल्लेख नसल्याचं शिंदे गटाच्या वकिलांनी सांगितले.