नवी दिल्ली: देशात वाढत्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमिवर आता नवा नियम लागू करण्यात आला आहे. आता कारमधून प्रवास करणाऱ्या सर्वांनी सीट बेल्ट लावणे बंधनकारक असणार आहे. सीट बेल्ट न लावल्यास दंड आकारण्यात येणार आहे. उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्या अपघातानंतर रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी, ६ सप्टेंबर रोजी ही मोठी घोषणा केली.
आता इथून पुढे सर्व कारमध्ये मागील सीटवर बसणाऱ्यांसाठीही सीट बेल्ट अलार्मची सुविधा दिली जाणार. यासंदर्भातील अधिसूचना काही दिवसांत काढण्यात येणार असल्याची माहिती गडकरी यांनी दिली. या अलार्ममुळे पाठिमागे बसलेले लोक बेल्ट लावायला विसरणार नाहीत. मंगळवारी यूएस-इंडिया बिझनेस कौन्सिलच्या इंडिया आयडियाज समिटमध्ये बोलताना नितीन गडकरी यांनी ही घोषणा केली.
दरम्यान, कारमध्ये हे फीचर आणल्यानंतर मागच्या सीटवर बसलेले प्रवासी सेफ्टी बेल्ट लावायला विसरणार नाहीत. कारचे सेन्सर अशा प्रकारे बसवले जातील की सीट बेल्टचे बकल बंद केले नाही तर अलार्म वाजू लागणार आहेत, ही सुविधा सध्या काही कारमध्ये आहे.