मुंबई: याकूब मेमनच्या कबरीवरुन भाजपने आता शिवसेनेवर हल्लाबोल सुरु केला आहे. अशातच आता मुंबई भाजपा अध्यक्ष, आमदार आशिष शेलार यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडले आहे.
“राज्यात आणि मुंबई पालिकेत यांची सत्ता असताना तुम्ही दाऊदचे प्रचारक म्हणून काम करायचा का? सत्तेत असताना शिवसेनेत दाऊदचे समर्थक होते आम्ही पाहीले होते. मैदाने, उद्याने, स्मशानभूमींचे सुशोभिकरण, देखभाल, दुरुस्तीची संपूर्ण जबाबदारी मुंबई पालिकेची असते. महापौर तुमचा, मुख्यमंत्री तुम्ही आणि दाऊदचे प्रचारक म्हणून काम करताय? पेंग्विन सेनेचे युवा अध्यक्षांनी कबर बचाव अभियान सुरू करावे अशी बोचरी टीका मुंबई भाजपा अध्यक्ष, आमदार आशिष शेलार यांनी शिवसेनेवर केली.
तसेच ते पुढे म्हणाले, तुम्ही 25 वर्ष सत्तेत बसलात, महापौर तुमचा तरी ही याची खबर कशी नाही मिळाली? ही जबाबदारी तुमचीच आहे. माझी खुर्ची, माझा परिवार यापलीकडे पेंग्विन सेनेला अस्तित्व नाही. पेंग्विन सेना वानखेडे उखडून टाकायला गेले होते ना मग आता ही कबर उखडून दाखवा. तुकडे तुकडे गॅंगच्या दबावाखाली हे केले आहे, असे वक्तव्य करत त्यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे.