अकोला : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलयुक्त शिवार योजना पुन्हा सुरू करणार असल्याची मोठी घोषणा केली आहे. तसेच, येत्या काळात शेतकऱ्यांना 12 तास वीज देण्याची घोषणा देखील देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
दरम्यान, राज्यात भाजपाचे सरकार असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलयुक्त शिवार नावाची योजना सुरू केली होती. ही फडणवीस यांची एक महत्त्वकांक्षी योजना होती. मात्र 2019 ला राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आले. सत्ता येताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील सरकारने या योजनेला स्थगिती दिली होती. योजनेला स्थगिती देण्यात आल्याने त्यावेळी मोठ्या प्रमाणात आरोप-प्रत्यारोप झाले. मात्र आता पुन्हा एकदा राज्यात शिंदे, फडणवीस सरकार येताच देवेंद्र फडणवीस यांनी जलयुक्त शिवार योजना पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली आहे.