कोलकाता : भारताच्या भेदक गोलंदाजीपुढे दक्षिण आफ्रिकेने सपशेल लोटांगण घातले. भारताने तब्बल २४३ धावांनी दणदणीत विजय मिळवत आपली विजयी घौडदौड कायम ठेवली आहे. या विजयाने टीम इंडियाचे गुणतालिकेतील अव्वल स्थान कायम राखले आहे. आजच्या सामन्यात बर्थडे बॉय विराट कोहलीने वन डे क्रिकेटमधील ४९ वे शतक झळकावत मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या विक्रमाची बरोबरी साधली आहे. त्यालाच सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
तत्पूर्वी, भारताची सुरुवात खूपच आक्रमक झाली. कर्णधार रोहित शर्मा आणि शुबमन गिलने पॉवर प्लेमध्ये सर्वाधिक ९० धावा केल्या. मात्र मोठा फटका मारण्याच्या नादात रोहित ४० धावा करून बाद झाला. रोहित शर्माने शुबमन गिलसह ३५ चेंडूत ६२ धावांची भागीदारी केली. रोहित २४ चेंडूत ४० धावा करून बाद झाला. त्याने आपल्या खेळीत सहा चौकार आणि दोन षटकार मारले.
शुबमन गिल २४ चेंडूत २३ धावा करून बाद झाला. आपल्या खेळीत त्याने चार चौकार आणि एक षटकार लगावला. ९३ धावांवर दोन विकेट्स पडल्यानंतर विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांनी १३४ धावांची भागीदारी केली. श्रेयस ८७ चेंडूत सात चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ७७ धावा करून बाद झाला. केएल राहुल काही विशेष करू शकला नाही आणि त्याला केवळ आठ धावा करता आल्या. सूर्यकुमार यादवने १४ चेंडूत पाच चौकारांच्या मदतीने जलद २२ धावा केल्या.
विराटने ४९ व्या षटकात आपले शतक पूर्ण केले. १२१ चेंडूत १० चौकारांच्या मदतीने १०१ धावा करत तो नाबाद राहिला. त्याचवेळी जडेजाने २९ धावांच्या नाबाद खेळीत तीन चौकार आणि एक षटकार ठोकला. विराटचे हे ४९वे शतक होते. त्याने सचिन तेंडुलकरच्या ४९ वन डे शतकांच्या विक्रमाशी बरोबरी केली. दक्षिण आफ्रिकेकडून लुंगी एनगिडी, मार्को जॅनसेन, कागिसो रबाडा, केशव महाराज आणि तबरेझ शम्सी यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.