कोल्हापूर : नरेंद्र मोदी यांनी मला उद्देशून अतृप्त आत्मा अशी टीका केली यामध्ये आश्चर्य करण्यासारखे काहीच नाही. नरेंद्र मोदी यांच्या इतकी पंतप्रधान पदाची अप्रतिष्ठा कधीच झाली नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी गुरुवारी कोल्हापूर येथे केली.
पत्रकारांची संवाद साधताना ते म्हणाले, मी पंडित जवाहर नेहरूंना पाहिले आहे. इंदिरा गांधी यांच्यापासून नंतरच्या सर्वच पंतप्रधानांच्या संपर्कात आलो आहे. त्यांच्याशी भेटणे, बोलणे झाले आहे. त्यांची भाषणे ऐकली आहेत. परंतु अतृप्त आत्मा सारखे शब्द नरेंद्र मोदी वापरतात तेव्हा त्यात काही आश्चर्य नसते. कारण मोदी यांच्या इतकी पंतप्रधान पदाची अप्रतिष्ठा कोणीच केलेली नाही, अशी टीका त्यांनी केली.
अतृप्त आत्मा असे विधान मोदींनी का केले अशी विचारणा मी त्यांना भेटल्यानंतर करेन, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले होते. याकडे लक्ष वेधले असता शरद पवार म्हणाले , अजित पवार काय म्हणाले यापेक्षा पंतप्रधान काय म्हणाले या बोलण्याला अधिक महत्त्व आहे.
इंडिया आघाडीचे सरकार देशात आले तर पाच वर्षात पाच पंतप्रधान होतील, अशी टीका नरेंद्र मोदी यांनी सभांमधून चालवली आहे. याबाबत शरद पवार म्हणाले ,१९७७ मध्ये जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली आवाज उठला गेला. आणि काँग्रेस पराभूत झाली. तेव्हा विरोधकांचा नेता कोण? असा प्रश्न उपस्थित झाला होता. परंतु सर्वांनी एकत्रित येऊन मोरारजी देसाई यांची पंतप्रधानपदी निवड केली होती. त्यामुळे आताही इंडिया आघाडीचे सरकार आले तर पंतप्रधान कोण होणार याची चिंता करण्याचे काहीच कारण नाही. आम्ही सर्वजण निवडणूक झाल्यानंतर एकत्र बसू. एकमताने पंतप्रधान पदाचा निर्णय घेऊ. पंतप्रधान पदाबद्दल वाद असणे आमच्या कोणाच्याही डोक्यात नाही; ते त्यांच्या डोक्यात आहे, असा टोला त्यांनी लगावला.
आमचे सरकार आल्यापासून उसाच्या एफआरपी मध्ये प्रतिटन तीनशे रुपये दरवाढ केली आहे, असा दावा करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राचे एक मंत्री केंद्रात कृषी मंत्री असतानाही तितकी वाढ कधीच झाली नव्हती, अशी टीका शरद पवार यांना उद्देशून केले होती. त्यावर बोलताना शरद पवार म्हणाले, मुळात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक दराची हमी देण्यासाठी आमच्या सरकारच्या काळात एफ आर पी दरवाढीचे सुत्र ठरवले गेले होते.