दिल्लीतील सोने तस्करी प्रकरणी एनआयए पथकाचा खानापुर मध्ये छापा
खानापुर : दिल्लीतील सोने तस्करी प्रकरणी एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास संस्थेच्या पथकाने गुरुवारी जाधववाडी (ता. खानापूर) येथे छापे टाकत काही संबंधितांची चौकशी केली आहे. दोन महिन्यांपूर्वी दिल्ली रेल्वे स्टेशनवर ८३.६२१ किलो सोने जप्त करण्यात आले होते. हे सोने गुवाहाटीवरून आठ जण मिळून दिल्लीला रेल्वेमधून आणत होते. त्यावेळी दिल्ली रेल्वे स्टेशनवर डीआरआयने या आठ जणांना ४२ कोटी बाजार मूल्य असलेल्या या सोन्याच्या बार्ससह पकडले होते. या प्रकरणाचे सांगली जिल्ह्याशी असलेले कनेक्शन यापूर्वीच उघड झाले आहे.
या आरोपींची सखोल चौकशी सुरू असून त्यातून अधिक तपासणी करण्यासाठी एनआयएच्या टीमने खानापूर तालुक्यात जाधववाडी येथे छापे टाकले. यावेळी या पथकाने याप्रकरणी काही जणांची चौकशी केली. दरम्यान, या प्रकरणाची अधिक माहिती अशी की, दोन महिन्यांपूर्वी २८ ऑगस्ट रोजी दिल्लीच्या रेल्वे स्टेशनवर आठ जणांना सोन्याच्या बिस्किटांसह पकडले होते. ते सर्व जण स्वतःची खरी ओळख लपवून बोगस आधारकार्ड बनवून प्रवास करीत होते. म्हणून त्यांच्यावर यूएपीए कायद्यांतर्गत (सुधारीत बेकायदा प्रतिबंधक हालचाली कायदा १९६७) गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.
यामध्ये दहशतवादाच्या वाढीसाठी रसद पोचवणे, दहशतवादी लोकांना आर्थिक पाठबळ देणे, तसेच दहशतवादी साहित्याचा प्रचार प्रसार करून तरुणांच्या मनात दहशतवादाची बिजे रुजवणे आदी गुन्ह्यांचा ठपका ठेवण्यात आला आहे. अटक केलेल्यांमध्ये रवीकिरण गायकवाड, पवन कुमार गायकवाड, योगेश हणमंत रुपनर, अभिजित बाबर, सद्दाम पटेल, अवधूत अरुण विभूते, सचिन आप्पासो हसबे, दिलीप लक्ष्मण पाटील अशी आरोपींची नावे आहेत. दरम्यान मागच्या महिन्यात आटपाडी तालुक्यातील दिघंची येथील काही लोकांची चौकशी या पथकाने केली होती. या प्रकरणाचा अद्यापही तपास सुरू आहे.
Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज