कोरोनाच्या चाचण्यांमध्ये हेराफेरी ; थायरोकेअरच्या एमडींचा आरोप
कोरोनाचा संसर्ग खर्च कमी होत आहे का? देशातील सर्वात मोठे खासगी कोरोना चाचणी केंद्र थायरोकेअरनं कोरोना चाचण्यांसंदर्भात एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. कोरोनाच्या चाचण्यांमध्ये हेराफेरी होत असल्याचा आरोप थायरोकेअरचे व्यवस्थापकीय संचालक ए.वेलुमणी यांनी केला. काही जिल्ह्यांमध्ये सरकारी अधिकारी आपल्या जिल्ह्याची प्रतीमा चांगली ठेवण्यासाठी कोरोना विषाणूची चाचणी थेट नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप वेलुमणी यांनी केला.
“सध्या चाचण्या सर्वांसाठी सुरू झाल्या असल्या तरी जिल्हा पातळीवर सरकार खासगी केंद्राच्या चाचण्यांवर नियंत्रण ठेवत आहे. पूर्वीच्या तुलनेत सद्यस्थितीत हे अधिक प्रमाणात होत आहे. आम्हाला निरनिराळ्या राज्यांमधील काही जिल्ह्यांमध्ये नमूने न घेण्यास सांगितलं जात आहे आणि आम्ही बनावट पॉझिटिव अहवाल सादर करत असल्याचा दावा केला जात आहे,”असं थायरोकेअर टेक्नॉलॉजीजचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक वेलुमनी यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना सांगितलं. “दररोज कमीतकमी १०० जिल्ह्यांमध्ये दोन हजार नमूने कमी केले जात आहेत. आपल्या जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या कमी आहे हे दाखवणं यामागील त्यांचा उद्देश आहे. ते आपली प्रतीमा चांगली ठेवू इच्छित आहेत. थायरोकेअरनं ज्या जिल्ह्यांमधून तपासणीसाठी नमूने घेतले आहेत त्यापैकी ३० टक्के चाचणी केंद्रांना ही समस्या भेडसावत आहे,” असंही त्यांनी नमूद केलं. दरम्यान, त्यांनी कोणत्याही जिल्ह्यांच नाव घेतलं नाही. परंतु आपल्या कर्मचार्यांना चाचण्यांची संख्या मर्यादित करण्यास तोंडी सांगितल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
थायरोकेअर हे देशातील पाच मोठ्या चाचणी केंद्रांपैकी एक आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, बिहार, पश्चिम बंगाल, जम्मू काश्मीर, झारखंड. उत्तर प्रदेश, दिल्ली आणि उत्तराखंडमधील करोनाबाधितांच्या चाचण्यांचे नमूने एकत्र करण्याचं काम थायरोकेअरद्वारे करण्यात येतं.
दरम्यान, दुसरीकजे मेट्रोपोलिस हेल्थकेअरच्या व्यवस्थापकीय संचालक अमीरा शाह यांनी कोरोना महासाथ वाढीदरम्यान चाचण्यांची संख्या वाढवण्याची आवश्यकता असल्याचं म्हटलं. “जितक्या चाचण्या अधिक प्रमाणात होतील, तितकंच करोनाबाधितांची अधिक काळजी आपल्याला घेता येईल. याव्यतिरिक्त त्यांच्या संपर्कात आलेल्यांची माहितीही आपल्याला मिळेल. याद्वारे ऑक्टोबर ते डिसेंबरदरम्यान करोनाची दुसरी लाट येण्यास आपण रोखू शकतो,” असंही त्या म्हणाल्या.
“वेलुमणी यांनी उचललेल्या प्रश्नांचा आम्हीदेखील सामना करत आहोत. महाराष्ट्र आणि गुजरातमधील काही भागांमध्ये असे प्रयत्न केले जात आहेत. प्रत्येक ठिकाणी असे प्रकार होताना दिसत नाहीत. परंतु काही ठराविक ठिकाणी हे होताना दिसत आहेत. अशा प्रकारांमुळे आम्हाला पूर्ण क्षमतेनं चाचण्या करता येत नाहीत.” असं एका चाचणी केंद्राच्या अधिकाऱ्यानं नाव न घेण्याच्या अटीवर सांगितलं.
Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज