“शेतकऱ्यांचा मोदी सरकारवरचा विश्वास उडाला” : या काँग्रेसच्या नेत्याचा केंद्र सरकारवर हल्लाबोल
नवी दिल्ली : नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकरी संघटना आपल्या मागण्यांवर ठाम असून, आता या आंदोलनाची तीव्रता वाढवण्याचे शेतकऱ्यांनी ठरवले आहे. शिवाय, शेतकरी संघटनांनी सर्वोच्च न्यायालयातही धाव घेतली आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेससह विरोधी पक्षांकडून केंद्र सरकारवर सातत्याने टीका सुरू आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
”कृषी कायदे हटवण्यासाठी आमच्या शेतकरी बांधवांना आणखी किती बलिदान द्यावे लागेल?” असा प्रश्न त्यांनी ट्विटद्वारे केंद्र सरकारला विचारला आहे. काँग्रेसने म्हटले आहे की, कृषी कायद्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान आतापर्यंत ११ शेतकऱ्यांना आपला जीव गमावावा लागला आहे. मात्र तरीही केंद्र सरकारच्या हृदयास पाझर फुटलेला नाही. केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांच्या संवैधानिक वैधतेला आव्हान देणाऱ्या प्रलंबित याचिकांमध्ये पक्षकार करण्याच्या मागणीसाठी भारतीय किसान युनियनने शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
केंद्र सरकारने केलेले नवे कृषी कायदे असंवैधानिक, शेतकरीविरोधी आहेत. या कायद्यांमुळे मोठय़ा कंपन्या आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या लालसेपुढे शेतकरी हतबल ठरेल. हे कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे नाहीत, तर त्यामागे कंपन्यांचे हित साधण्याचा कुटिल हेतू आहे, असे भारतीय किसान युनियनने न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत नमूद केले आहे.
या अगोदर कृषी कायदे रद्द करावेत यासाठी बुधवारी राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, डाव्या पक्षांचे नेते सीताराम येचुरी यांच्यासह पाच नेत्यांनी राष्ट्रपतींची भेट घेतली होती. त्यानंतर राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका करत शेतकऱ्यांचा मोदी सरकारवरचा विश्वास उडाला असल्याची टीका केली होती. तसेच, कृषी कायदे हे देशातल्या शेतकऱ्यांचं हित साधणारेच आहेत असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं होतं. असं असेल तर मग आज शेतकरी रस्त्यावर का आहेत? आपल्या देशातला शेतकरी हा देशाच्या जडणघडणीतला एक जबाबदार घटक आहे. तो मागे हटणार नाही आणि घाबरणार नाही असंही राहुल गांधी यांनी त्यावेळी म्हटलं होतं.
Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज