माणदेश एक्सप्रेस न्युज : विटा : कृष्णा नदीचे सांगली जिल्ह्यातील पात्र बहुतेक ठिकाणी कोरडे पडले आहे. त्यामुळे नदीकाठासह अनेक गावातील पिण्याच्या पाण्याचा व सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यामुळे कोयना धरणातून पाणी सोडण्यात यावे अशी मागणी सतत होत होती.
पाणी सोडण्यासाठी पाठपुरावा सुरू होता मात्र पाणी सोडले जात नव्हते. याप्रकरणी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाई यांच्याकडे बोट दाखविले जात होते. मात्र याबाबत आमदार अनिल बाबर यांनी मंत्री शंभूराज देसाई आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी थेट संपर्क साधला.
यावेळी त्यांनी सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीकाठच्या पाण्याची सद्यस्थितीची कल्पना दिली. पिण्यासाठी आणि शेतीसाठी पाणी गरजेचे आहे, त्यामुळे कृष्णा नदीमध्ये कोयना धरणातून दरमहा पाच टीएमसी पाणी सोडण्यात यावे अशी मागणी केली.
यावर मुख्यमंत्र्यांनी तात्काळ उद्यापासून म्हणजेच गुरुवारपासून पाणी सोडण्याचे आदेश पाटबंधारे विभागाला दिली आहे. शिवाय दरमहा महिन्यातून कृष्णा नदीमध्ये पाच टीएमसी पाणी सोडण्यासंदर्भात नियोजन करण्याचेही आदेश दिले आहेत, असेही आमदार बाबर यांनी सांगितले.