माणदेश एक्सप्रेस न्युज : कवठेमहांकाळ: शिरढोण ता.कवठेमहांकाळ येथील रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपूलावर चालकाचा ताबा सुटल्याने कार दुभाजकावर जोरदार आदळून झालेल्या अपघातात तीन जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाला.
सूर्यकांत दगडु जाधव, गौरी केदार जाधव, युवराज विजय जाधव अशी मृतांची नावे आहेत. तर प्रशांत चीले (सर्व रा. कोल्हापूर) हा गंभीर जखमी झाला. हा अपघात सोमवारी सायंकाळच्या सुमारास झाला. या अपघाताची नोंद कवठेमहांकाळ पोलिसात झाली आहे.
याबाबत माहिती अशी की कोल्हापूर येथील जाधव कुटूंब सूर्यकांत जाधव, गौरी जाधव, युवराज जाधव, व प्रशांत चिले हे पंढरपूर येथे देवदर्शनासाठी गेले होते. पंढरपूरहून ते कोल्हापूरला कार क्रमांक (एम एच ०९ जी एफ ८३२३) ने जात असताना शिरढोण गावच्या हद्दीत चालकाचा ताबा सुटल्याने कार उड्डाणपूलावरील दुभाजकावर आदळली.
यामध्ये सूर्यकांत जाधव, गौरी जाधव, युवराज जाधव हे जागीच ठार झाले. तर प्रशांत चिले हे गंभीर जखमी झाले. जखमी चिले यांना मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या अपघाताची नोंद पोलिसात झाली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर करीत आहेत.