माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी : आटपाडी तालुक्यातील राजेवाडी येथील सद्गुरू साखर कारखान्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने विविध मागण्यासाठी मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिली. तर दिघंची येथे झालेली बैठकीमध्ये बोलत होते.
पुढे बोलताना महेश खराडे म्हणाले, पिढ्यानपिढ्या दुष्काळी असणाऱ्या आटपाडी तालुक्यात टेंभूच्या पाण्यामुळे ऊसाचे क्षेत्र वाढले आहे. त्यातच तालुक्यातील माणगंगा कारखाना बंद आहे. याचा दुरुपयोग राजेवाडीचा सद्गुरू कारखाना घेत असून, आटपाडी तालुक्यातील ऊस तोडणी साठी टाळाटाळ करत आहे.
तसेच सांगली जिल्ह्यातील अन्य कारखाने ३००० पेक्षा जास्त देत असताना राजेवाडीचा सद्गुरू कारखाना २७०० दर देतो, त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्याचबरोबर ऊस तोडणीसाठी शेतकऱ्यांना ज्यादा पैसे द्यावे लागत आहेत. यासह अन्य मागण्यासाठी दिनांक पाच फेबुवारी रोजी कारखान्यावर मोर्चा काढण्यात येणार आहे.
त्याचबरोबर अन्य प्रश्नावर जनजागृती करण्यासाठी दिनांक ८ पासून तालुक्यात जन आक्रोश संवाद यात्रा काढण्यात येणार आहे. या माध्यमातून प्रत्येक गावात व प्रत्येक माणसापर्यंत संवाद साधला जाणार आहे असल्याचे ते म्हणाले. यावेळी बैठकीस मोठ्या संख्येने आटपाडी तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते.