माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी : सुशांत दिलीप यादव रा. विठलापूर या युवकाचा गलाई दुकानात घातपाताने मृत्यू झाला. याप्रकरणी संशयित दुकानदार शिंदे बंधूंवर खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना तातडीने अटक करावी या मागणीसाठी आजपासून आटपाडी पोलिस ठाण्यासमोर मृत सुशांतची आई रतन यादव यांनी सुरू केलेले बेमुदत धरणे आंदोलन पोलिसांच्या आश्वासनानंतर मागे घेण्यात आले.
दिघंची येथील दिलीपकुमार ऊर्फ बाळू पांडुरंग शिंदे आणि विलास पांडुरंग शिंदे यांच्या उत्तर प्रदेशातील भयराईच येथील गलाई दुकानात कामाला होता. फेब्रुवारी महिन्यात सुशांत गावी आला. २९ फेब्रुवारीला बाळू आणि पांडुरंग शिंदे यांनी सुशांतच्या घरी येऊन दुकानातील हिशोब करण्यासाठी जायचे आहे सांगून सांगून त्याला मोटारीतून उचलून नेले . त्यानंतर दोनच दिवसांत त्याचा मृतदेह घेऊन शववाहिका विठलापूर येथे आली.
अचानक घडलेली ही घटना घातपाताचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त करून शवविच्छेदन केल्याशिवाय मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका पालकांनी घेतली.तीन दिवस मृतदेह शववाहिकेत होता.ग्रामस्थांनी पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले होते.त्यानंतर शवविच्छेदन झाल्यावर मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यामुळे आज रतन यादव यांनी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले.यावेळी पोलीसांनी निवडणूक आचारसंहिता असल्याने मनुष्यबळ कमी आहे.७ मे नंतर सखोल तपास करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले.त्यामुळे आंदोलन मागे घेण्यात आले.