माणदेश एक्सप्रेस न्युज : सांगली/प्रतिनिधी : सांगली लोकसभेसाठी स्वाभिमानी पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांची उमेदवारी जाहीर करत आहोत अशी घोषणा माजी खा.राजू शेट्टी यांनी केली.
राजू शेट्टी म्हणाले, सांगली लोकसभेसाठी सध्याचे उमेदवार हे साखर सम्राट आहेत. त्यांनी शेतकऱ्यांना लुबाडले आहे, लुटले आहे. अशा साखर सम्राटाना आणखी लुटण्यासाठी ताकद कशासाठी देताय. या उलट आमचा उमेदवार रस्त्यावर लढणारा, संघर्ष करणारा, रक्त सांडणारा आहे. शेतकऱ्यांसाठी त्याच्या नावावर अनेक गुन्हे दाखल आहेत. प्रसंगी तुरुंगवास देखील भोगला आहे.
पोलिसाच्या लाठ्या-काठ्या खाल्या आहेत. ऊस दरासाठी जयंतराव पाटील यांच्या कारखान्यावर गव्हाणीत टाकलेल्या उड्या असो, खा.संजयकाका पाटील यांनी बुडविलेली ऊस बिले काढण्यासाठी त्याने संघर्ष करून 70 कोटीची ऊस बिले वसुल करून दिली आंहेत. पृथ्वीराज देशमुख, राजेंद्रअण्णा देशमुख यांच्या कारखान्यावर ऊस आंदोलन करून थकीत ऊस बिले वसुल करून दिली आहेत.
जिल्हा बँकेच्या ओटीएस योजनेसाठी त्याने प्रयत्न केला आहे. यंदाच्या ऊस दरासाठी सांगली जिल्ह्यात 22 दिवसाची तब्बल 550 किलोमीटरची पदयात्रा काढली. पायाला फोड आले, तरी त्याची फिकीर न करता तो शेतकऱ्यांसाठी चालत राहिला. शेतकऱ्यांना संघटित करत राहिला, कडकनाथ घोटाळ्यातील आरोपीना अटक करण्यासाठी त्याने जीवावर उदार होऊन देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यावर कडकनाथ कोंबड्या फेकून त्या प्रश्नाचे गांभीर्य सरकारच्या लक्षात आणून दिले.
बेदाण्याचा शालेय पोषण आहारात समावेश करण्यासाठी त्याने संघर्ष करून यश मिळविले. दूध दरासाठी ही त्याची धडपड सुरु असते. या संघर्षा बरोबरच गेली दहा वर्षे तासगाव येथे शिवार कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून नवे तंत्रज्ञान शेतकऱ्याच्या बांधा पर्यंत पोहचवण्यात तो यशस्वी झाला आहे.
शेतकरी आणि सर्वसामान्य लोकांच्यासाठी तो जीवावर उदार होऊन प्रपंचाची राख रांगोळी करून संघर्ष करतो आहे. आमचा उमेदवार फाटका आहे, गरीब शेतकरी कुटूंबातील आहे. त्यामुळे ही निवडणूक ‘एक व्होट एक नोट’ या तत्वावर लढविली जाणार आहे. त्याला व्होट ही द्या आणि त्याच्या फाटक्या झोळीत नोट ही टाका. जगाचा पोशिंदा बळीराजा जगला पाहिजे आणि चळवळ टिकली या भावनेतून ही निवडणूक लढविली जात आहे.
चळवळ टिकविण्यासाठी महेश खराडे यांच्या पाठीशी रहा त्याला साथ द्या असे कळकळीचे आवाहन जिल्ह्यातील शेतकरी, शेमजूर, तरुण शेतकरी, महाविद्यालयीन युवक, युवती, महिला,शिक्षक, प्राध्यापक, वकील, अभियंते, डॉक्टर, बिल्डर, कॉन्ट्रक्टर, व्यावसायिक, व्यापारी यांना करत आहे हा उमेदवार तुमच्या झोळीत टाकला आहे त्याला साथ द्या विजयी करा असे आवाहन राजू शेट्टी यांनी केले आहे.