राष्ट्रीय आरोग्य मिशन ४०० कोटींचा आर्थिक घोटाळा ; देवेंद्र फडणवीस यांची चौकशी करण्याची मागणी
मुंबई – राज्य सरकारमार्फत केंद्र सरकारकडून प्राप्त होत असलेल्या निधीतून राष्ट्रीय आरोग्य मिशनची अंमलबजावणी करण्यात येते. यात सुमारे ४०० कोटींचा आर्थिक घोटाळा सेवेत कायम नियुक्त्या देण्याच्या नावाखाली होत असल्याची तक्रार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्र पाठवून माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तसेच यासंदर्भात त्यांनी पत्राद्वारे याची चौकशी करण्याची मागणीही केली आहे.
केंद्र सरकारची राष्ट्रीय आरोग्य मिशन ही योजना असून केंद्राच्या निधीतून पण राज्य सरकारमार्फत त्याची अंमलबजावणी केली जाते. त्यामुळे राज्य सरकारमार्फतच उमेदवारांच्या नियुक्त्यांची प्रक्रिया होते. कंत्राटी तत्त्वावर काम करणार्यांलना सेवेत कायम नियुक्त्या देण्यासंदर्भातील काही विधाने मंत्र्यांकडून या योजनेत आल्यानंतर, संपूर्ण राज्यात कायमस्वरूपी नियुक्त्यांसाठी आर्थिक देवाणघेवाणीला प्रचंड वेग आला आहे. यासंदर्भात दूरध्वनी संवादाच्या तीन ऑडिओ क्लिप सुद्धा या पत्रासोबत जोडत असल्याचे फडणवीस यांनी नमूद केले आहे.
या ऑडिओ क्लिपमधील संवादानुसार, राज्यात सुमारे २० हजार असे उमेदवार असून, सेवेत त्यांना कायम करण्यासाठी, १ ते २.५० लाख रूपये त्यांच्याकडून घेतले जात आहेत. म्हणजेच यासाठी सुमारे ३०० ते ४०० कोटी रूपयांचे जमा होत आहेत. कुणाच्या आशीर्वादाने हे सारे होत आहे, याचीही सखोल चौकशी करणे गरजेचे आहे. सुमारे ४०० कोटींची उलाढाल महाराष्ट्रात सेवेत कायम करण्यासाठी होत असेल तर ते अतिशय गंभीर असल्याचेही त्यांनी पत्राद्वारे म्हटले आहे.
Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज