Type Here to Get Search Results !

आज वटपौर्णिमा ; जाणून घेऊया सणाची संपूर्ण माहिती व वट पौर्णिमेचे महत्व :

 




सांगली : पौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात. पर्यावरण शास्त्राच्या दृष्टीने वडाचे विशेष महत्त्व असल्याने त्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणे हा या पूजेचा एक हेतु आहे. तसेच सावित्रीने आंतरिक गुणांची पारख करून निवडलेल्या वारस आईबापानी देवगुरु यांच्या विरोधाला मागे सरुन माळ घातली व पतीचे प्राण वाचविण्याचे अवघड काम चिकाटीने, प्रबळ इच्छाशक्ती आणि चातुर्याने करून दाखवली आहे. 

भारतातील स्त्रिया इतर सणाप्रमाणे वटपौर्णिमा हा सण मोठ्या उत्साहाने व आनंदाने आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी साजरी करतात. हिंदू धर्मातील महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वर्षातून एकदा हा उपवास करतात. तो उपवास वटपौर्णिमेचा असतो. त्यादिवशी सावित्रीने सत्यवानाचे प्राण परत आणले. अशी आख्यायिका आहे. त्यामुळे वटपौर्णिमेला हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे.

वटपौर्णिमा विषयी पौराणिक कथा :

वटपौर्णिमा विषयी ही एक पौराणिक कथा आहे. खूप वर्षापूर्वी भद्र देशात अश्वपती नावाचा राजा राज्य करीत होता. त्याला सावित्री नावाची कन्या होती. सावित्री अतिशय सुंदर नम्र व गुणी मुलगी होती. सावित्री उपवर झाल्यावर राजाने तिलाच आपला पती निवडण्याची परवानगी दिली. सावित्रीने सत्यवान नावाच्या राजकुमाराची निवड केली. सत्यवान हा शाल्व राज्याचा धृमत्सेन नावाच्या अंध राजाचा मुलगा होता. शत्रूकडून हरल्यामुळे आपल्या राणी व मुलासहित राजा जंगलात राहत होता.

भगवान नारदाला सत्यवानाचे आयुष्य केवळ एक वर्षाचेच असल्याचे माहित असल्यामुळे त्यांनी त्याच्याशी लग्न करू नको असा सल्ला सावित्रीला दिला. पण सावित्रीने ते मान्य केले नाही. तिने सत्यवानाशी विवाह केला व जंगलात घेऊन, ती नवऱ्याबरोबर, सासू-सासर्यां ची सेवा करू लागली. सत्यवानाचा मृत्यू जेंव्हा तीन दिवसावर येऊन ठेपला, तेंव्हा तिने तीन दिवस उपवास करून सावित्री व्रत आरंभिले. सत्यवान जंगलात लाकडे तोडण्यास निघाला असता, सावित्री त्याच्या बरोबर गेली.

लाकडे तोडता तोडता त्याला घेरी आली व तो जमिनीवर पडला. यमधर्म तिथे आला व सत्यवानाचे प्राण घेऊ लागला. सावित्री यमाच्या मागे आपल्या पतीबरोबर जाऊ लागली. यमाने अनेक वेळा सावित्रीस परत जाण्यास सांगितले. पण तिने साफ नाकारले व पतीबरोबर जाण्याचा हट्ट धरला. अखेर कंटाळून यमाने पती सोडून तिला तीन वर मागण्यास सांगितले.

सावित्रीने सासूसासऱ्याचे डोळे व राज्य परत मागितले व आपल्याला पुत्र व्हावा असा वर मागितला. यमराजाने गफलतीने तथास्तु म्हटले तेव्हा त्याला वचनबध्द झाल्याची आठवण झाली व सत्यवानाचे प्राण परत करावे लागले. सत्यवानाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखालीच परत मिळविले. म्हणून ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून उपवास करतात व वटपौर्णिमा हे व्रत आचरणात आणतात.आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी स्त्रिया हे व्रत करतात.






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies