मुंबई - आशिष शेलार यांच्यावर मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी टाकण्यात आली आहे. गेल्या निवडणुकीत भाजपाला मुंबईत ८२ जागा मिळवण्यात यश आले होते. शेलारांसारखा आक्रमक चेहरा जो शिवसेनेला टक्कर देऊ शकतो यासाठी सरकारमध्ये मंत्रिपद देण्याऐवजी शेलारांना पक्षसंघटनेची जबाबदारी देण्यात आली आहे. मुंबई महापालिका निवडणूक भाजपासाठी महत्त्वाची आहे. या निवडणुकीत कुठल्याही परिस्थितीत भाजपाची सत्ता आणण्याचं पक्षश्रेष्ठींनी ठरवलं आहे. तर दुसरीकडे पालिकेवरील सत्ता कायम ठेवण्यासाठी शिवसेनेनेही कंबर कसली आहे.
एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेतील ४० आमदार, १२ खासदार यांच्यासह अनेक नगरसेवक, माजी नगरसेवक सध्या शिंदे गटाच्या संपर्कात आहेत. त्यामुळे शिवसेनेसमोर पक्षातील अंतर्गत नाराजी, शिंदे गटाचं वाढतं प्राबल्य आणि भाजपाची आक्रमक रणनीती यामुळे यंदा महापालिकेवर कुणाचा झेंडा फडकणार याबाबत सगळ्यांनाच उत्सुकता आहे.
दरम्यान, आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे मिशन १५० टार्गेट ठरवण्यात आल्याची माहिती आहे. अलीकडेच आशिष शेलार यांनी दिल्लीवारी केली. त्यात राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डा यांच्यासोबत झालेल्या बैठकीत शेलारांना मुंबई महापालिकेत १५० भाजपा नगरसेवक निवडून आणण्याचं टार्गेट देण्यात आले आहे. दरम्यान, मुंबई महापालिकेवर शिवसेनेची एकहाती सत्ता आहे. त्यामुळे ही सत्ता उलथवून लावण्यासाठी भाजपाने मिशन हाती घेतले आहे.