मुंबई :राज्यातील सत्तासंघर्षावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. बुधवारप्रमाणेच शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटाच्या वकिलांनी कोर्टात युक्तीवाद केला. दरम्यान कोर्टाने दोन्ही बाजूचे युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर आजची सुनावणी सोमवारपर्यंत ढकलली आहे. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी ८ ऑगस्टला होणार आहे.
दरम्यान, आजची सुनावणी सुरू होताच शिंदे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील हरिश साळवे यांच्याकडून युक्तिवाद करण्यात आला. उद्धव ठाकरेंच्या वतीने युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला.
तसेच, आज शिंदे गटाकडून आम्ही शिवसेना सोडली नाही असं वारंवार दावा केला जातो आहे. शिंदे गटाने शिवसेना सोडलेली नाही तर मग निवडणूक आयोगाकडे का गेला? असा सवाल ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी केला. तसेच हे प्रकरण मोठ्या खंडपीठाकडे देण्यास कपिल सिब्बल यांनी विरोध केला. या प्रकरणाची सुनावणी याच कोर्टात व्हावी, असंही त्यांनी सांगितलं. मात्र, कोर्टाने पुढच्या सोमवारी या प्रकरणावर सुनावणी करणार असल्याचे सांगितले. तसेच हे प्रकरण मोठ्या घटनापीठाकडे द्यायचे की नाही हे सोमवारीच ठरवू असंही कोर्टाने स्पष्ट केलं.