मुंबई: शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षितेखाली झालेल्या पहिल्याच कॅबिनेट बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. आजच्या बैठकीत शेतकऱ्यांसाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे. तसेच मुंबई मेट्रो मार्गिका -3 च्या सुधारित प्रस्तावास मान्यता देण्यात आली आहे.
या बैठकीत अतिवृष्टीग्रस्तांना सरकारने मोठा दिलासा दिला असून आता दोन ऐवजी तीन हेक्टर मर्यादेत मदत देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे, एनडीआरएफच्या मदतीपेक्षा दुप्पट मदत करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत झाला आहे. या निर्णयानुसार आता शेतकऱ्यांना १३,६०० रुपयांची मदत मिळणार आहे.
दरम्यान, राज्य मंत्रिमंडळाचा काल विस्तार झाल्यानंतर नवीन मंत्र्यांनी आज मंत्रालयात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत उपस्थिती लावली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवनियुक्त मंत्र्यांचे स्वागत करत बैठकीला सुरुवात केली.