मुंबई: राज्यातील शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या थांबवण्यासाठी राज्य सरकार नव्या मोहिमेची घोषणा करणार आहे. महाराष्ट्र शासनातर्फे 'एक दिवस शेतकऱ्यांच्या घरी' ही मोहीम रावबण्यात येणार आहे. राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार हे या नव्या मोहिमेची घोषणा आज, गुरुवारी सभागृहात करणार आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेण्यासाठी राज्यभर ही मोहीम राबवण्यात येणार आहे.
दरम्यान, या मोहिमेअंतर्गत शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेण्यासाठी राज्याच्या कृषीमंत्र्यांपासून सचिव, कृषी अधिकारी आणि या विभागातील सर्व अधिकारी एक दिवस शेतकऱ्यांच्या घरी मुक्काम करणार आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये ९० दिवस हा मुक्काम असणार आहे. यावेळी दिवसभरात शेतकरी काम करत असताना काय अडचणी येतात? बॅंकेचे कर्ज घेण्यासाठी काय अडचणी आहेत? शेतकरी का आत्महत्या करतोय याचा आढावा घेण्यात येणार आहे. हा आढावा घेतल्यानंतर अधिकाऱ्यांकडून अहवाल तयार करण्यात येणार आहे. हा आढावा घेतल्यानंतर त्याचा अभ्यास करुन त्यानंतर शेतकऱ्यांसाठी नवीन योजना राबवल्या जाणार आहेत.