मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने सर्वसामान्य जनतेची दिवाळी गोड व्हावी याकरिता स्वस्त धान्य दुकानात 100 रुपयांत चार वस्तु देण्याचा निर्णय घेतला होता. त्यात एक लिटर तेल, एक किलो रवा, साखर आणि चणाडाळ देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, या निर्णयाची अद्यापही अंमलबजावणी सुरू झालेली नाही.
माहितीनुसार, शिंदे-फडणवीस सरकारने राज्यातील सामान्य जनतेची दिवाळी गोड करण्याकरीता 100 रुपयांत चार वस्तु देण्याचा निर्णय घेतला होता. शिंदे सरकारने घेतलेल्या या निर्णयावरून अनेक जण स्वस्त धान्य दुकानात जाऊन चौकशी करत आहे. परंतु, स्वस्त धान्य दुकानात दिवाळीच्या वस्तूंची चौकशी करायला गेलेल्या नागरिकांना मात्र अद्यापही रिकाम्या हातीच परतावे लागत आहे.
दरम्यान, माहितीनुसार, आणखी 3 दिवस दिवाळी वस्तु भेटण्यास विलंब होणार असल्याने नागरिकांना आणखी वाट पहावी लागणार आहे. एकूणच दिवाळी गोड करण्याची घोषणा अद्यापही कागदावरच असल्याने नागरिकांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे.