मुंबई:उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा शिंदे गटावर निशाणा साधला आहे. उरणमधून मशाल घेऊन आलेल्या शिवसेना कार्यकर्त्यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते.
“शिवसेना संपवण्याचा ज्या ज्या वेळी प्रयत्न होतो, त्यावेळी शिवसेना आघात करणाऱ्याला गाडून चार पटीने उभी राहते. चिन्हा गोठवले, नाव गोठवले पण रक्त पेटवले. हे सळसळणारे रक्त समोरच्याला राजकारणात जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. शिवसेनेचा मुख्यमंत्री पुन्हा करून दाखवणारच, जे मी शिवतीर्थावरती बोललो ते आजही बोलणार आणि उद्याही बोलत राहणार आहे. दसरा मेळाव्यात एका बाजूला गोळा केलेली माणसे होती. तर दुसऱ्या बाजूला स्वत:हून आलेली तापलेल्या रक्ताची निष्ठावंत माणसे होती, असा टोला उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लगावला.