माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख माजी खासदार राजू शेट्टी यांनी राज्यातील लोकसभेच्या सहा जागा लढविण्याची घोषणा केली असून कोणाही बरोबर आघाडी करणार नसल्याने त्यांनी सध्या तरी स्पष्ट केले आहे. या सहा जागामध्ये सांगलीचा समावेश असून या ठिकाणी जिल्हाध्यक्ष महेश खराडे हे पक्षाचे प्रमुख उमेदवार आहेत. त्यांनी मतदार संघातील प्रत्येक विधानसभा क्षेत्रामध्ये भेट देवून शेतकऱ्यांच्या बांधा पर्यंत पोहचले आहेत. परंतु त्यांच्या या प्रयत्नाला मोठी ताकद म्हणजे त्यांनी बेदाण्याचा शालेय आहारात समावेश करण्याची केलेली मागणी अन त्याचा शालेय शिक्षण आह्रारात झालेला समावेश. त्यामुळे सध्या तरी स्वाभिमानीने प्रचारात आघाडी घेतली आहे.
सांगली लोकसभा हा काँग्रेसचा बालेकिल्ला रहिला आहे. परंतु 2014 च्या मोदी लाटेत प्रथमच काँग्रेसचा बालेकिल्ला प्रथमच ढासळला. वसंतदादांचे नातू व तत्कालीन मंत्री असलले प्रतीक पाटील यांना पराभव स्विकारावा लागला. २०१९ निवडणुकीमध्ये काँग्रेसची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडण्यात आली. परंतु या ठिकाणी वसंतदादा पाटील यांचे दुसते नातू विशाल पाटील यांनी राजू शेट्टी यांच्याकडून ही जागा हक्काने मागून घेत निवडणूक लढवली. या ठिकाणी त्यांनी तब्बल तीन लाख ४४ हजार मतदान त्यांनी घेतले होते.
परंतु आता पुलाखालून पाणी गेले आहे. स्वाभिमानीने या ठिकाणी लोकसभेला कोणासोबत आघाडी व युती करणार नसल्याचे स्पष्ट केल्याने या ठिकाणी जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यांनी जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघनिहाय सभा व बैठका यांना जोर लावला असून त्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे.
त्यांनी शेतकऱ्यांच्यासाठी केलेल्या आंदोलनामुळे त्याचा मोठा आर्थिक फायदा शेतकरी वर्गाला होत आहे. जिल्ह्यात ऊसदर वाढ व्हावी यासाठी संघटनेने केलेले आंदोलन व जिल्ह्यातील प्रमुख असलेल्या राजारामबापू साखर कारखान्याच्या गव्हाणीत मारलेल्या उड्या यामुळे जिल्हातील ऊसदाराची कोंडी फुटली व शेतकऱ्यांना याचा मोठा आर्थिक लाभ झाला.
त्याचप्रमाणे जिल्हापासून एका टोकाला असणाऱ्या आटपाडी तालुक्यातील राजेवाडीच्या सद्गुरू साखर कारखान्यावर शेतकऱ्यांच्यासाठी आंदोलन करत कारखाना बंद पाडत शेतकऱ्यांच्या ऊसाला दरवाढ करून दिली. त्यामुळे आटपाडी तालुक्यातील शेतकरी वर्गामध्ये समाधान व्यक्त होत आहे.
जिल्हातील संकटात सापडलेल्या द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांच्या बेदाण्यासाठी आग्रही भूमिका घेत बेदाण्याचा शालेय पोषण आहारात समावेश करण्यासाठी वेळोवेळी केलेली आंदोलने व त्याचा झालेला समावेश यामुळे जिल्ह्यातील द्राक्ष बागायत शेतकरी वर्गाला याचा मोठा आर्थिक लाभ मिळणार आहे.
उस व दूध दर, द्राक्ष, बेदाणा कर्जमाफी, दिवसा वीज आदी प्रश्नाेवर सुरू असलेला संघर्ष घराघरापर्यंत पोहचवून महेश खराडे यांनी निवडणुकीचे रणशिंग फुंकले असून ही निवडणूक ते , ‘एक वोट, एक नोट’ या तत्वावर लढविणार असून याला सध्या तरी मोठा प्रतिसाद मिळत असून महेश खराडे यांनी सध्या तरी प्रचारात आघाडी घेतली आहे.