माणदेश एक्सप्रेस न्युज : मुंबई : सांगली लोकसभा मतदारसंघ शिवसेनेच्या उबाठा गटाकडे आला आहे. परंतु, काँग्रेसचे इच्छुक उमेदवार विशाल पाटील यांनी या जागेवरील त्यांचा दावा सोडलेला नाही. विशाल पाटील यांनी सोमवारी (१५ एप्रिल) काँग्रेस आणि अपक्ष असे दोन उमेदवारी अर्ज दाखल केले. उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून ते मतदारसंघात जोरदार शक्तिप्रदर्शन करत आहेत. विशाल पाटलांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे या मतदारसंघात ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटलांची कोंडी होत आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, विशाल पाटलांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम तारखेपर्यंत आम्ही प्रयत्न करत राहू. विशाल पाटलांनी पक्षशिस्त मोडली तर आम्ही त्यांच्यावर कारवाईदेखील करू. आम्ही अजूनही विशाल पाटलांना समजावत आहोत. यामध्ये आम्हाला यश मिळेल असं मला वाटतं.
तर विशाल पाटील उमेदवारी अर्ज मागे घेतील, असा विश्वास ठाकरे गटानेही व्यक्त केला आहे. ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले, लोकसभेसाठी मविआचं जागावाटप पूर्ण झालं आहे. त्यात आता बदल होणार नाही. मागच्या लोकसभा निवडणुकीत विशाल पाटील हे शेतकरी संघटनेच्या तिकीटावर लढले होते. तेव्हा त्यांना काँग्रेसने तिकीट दिलं नव्हतं.
त्यामुळे यंदा ते पुन्हा एकदा तसाच प्रयत्न करत आहेत. मात्र काँग्रेस नेतृत्व योग्य ती पावलं उचलेल आणि अर्ज मागे घेण्याची वेळ येईल किंवा त्याची अंतिम तारीख असेल तेव्हा विशाल पाटील तो अर्ज मागे घेतील, तसेच चंद्रहार पाटलांच्या पाठिशी उभे राहतील.