मुंबई : राज्यातील दुचाकी व चारचाकी वाहनचालकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. वाहतूक नियमांची पायमल्ली करणाऱ्या वाहन चालकांना चाप बसवा, यासाठी पुढील आठवड्यापासून नवीन नियमांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारपासून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर मोटर वाहन अधिनियम कायदा 2019 अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. मद्यपान करुन वाहन चालवणाऱ्यांवर नवीन कायद्यानुसार पहिल्या गुन्ह्यासाठी 6 महिने तुरुंगवास आणि किंवा 10,000 रुपये दंड ठोठावला जाण्याची तरतूद आहे. तर दुसऱ्यांदा अशाच प्रकारचा गुन्हा केल्यास 2 वर्षे तुरुंगवास आणि किंवा 15,000 रुपयांचा दंड ठोठावला जाणार आहे. अर्थात अजून याबाबतचे अधिकृत आदेश आलेले नाहीत.
याबाबत माहिती देताना राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितले आहे की, परिवहन कायद्यांच्या काही नियमांच्या दंडामध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. रिफ्लेक्टर, टेल लॅम्प नसल्यास, हेल्मेट नसल्यास तसेच सीटबेल्ट नसल्यास वाहन चालकांना 1000 रुपये दंड तर वेगाने बाईक चालविल्यास, परमिटशिवाय वाहन चालविल्यास 2000 रुपये दंड आकारला जाऊ शकतो. फॅन्सी नंबर प्लेट वाहनचालकांनाही 1 हजार रुपयांचा दंड ठोठावला जाऊ शकतो. विनाहेल्मेट आढळणाऱ्या दुचाकीस्वारांचा परवाना तीन महिन्यांसाठी रद्दही केला जाणार आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास आकारण्यात येणाऱ्या सुधारित दंडाची अंमलबजावणीचा निर्णय वाहनचाकांना शिस्त लागावी, तसेच रस्ते अपघात कमी करण्यासाठी लागू करण्यात येणार असल्याचे परब यांनी सांगितले आहे.