मुंबई: मांसाहाराच्या जाहिरातींविरोधातील याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. सार्वजनिक ठिकाणी आणि टीव्हीसह इतर मीडियाच्या माध्यमातून करण्यात येणारी मांसाहाराशी संबंधित जाहिरातबाजी बंद करण्यात यावी, अशी मागणी करत काही जैन संस्थांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली.
टीव्हीवरील जाहिरातींचा त्रास होत असेल तर टीव्ही बंद करा, असं म्हणत हायकोर्टानं ही याचिका फेटाळली आहे. जैन समुदायातील काही संस्थांच्यावतीनं जगण्याच्या मुलभूत अधिकारांचा दाखला देत ही याचिका केली होती. या जाहिरातींमुळे त्यांच्या शांततेत जगण्याच्या मुलभूत अधिकारावर गदा येत असल्याचा आरोप करण्यात आला होता. कोर्टानं ही याचिका फेटाळली असली तरी नव्यानं याचिका दाखल करण्याची याचिकाकर्त्यांना मुभा देण्यात आली आहे.
दरम्यान या याचिकेत गुजरात, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांनी अश्याप्रकारची बंदी लावल्याचा दाखलाही देण्यात आला होता. या याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी झाली. ही याचिक कोर्टाने फेटाळून लावली आहे.