माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी / प्रतिनिधी : आटपाडी नगरपंचायतीला पिण्याच्या पाणीपुरवठा योजनेसाठी नगरोत्थान योजनेतून 83 कोटी 82 लाख रुपये मंजूर झाले आहे. त्यामुळे आटपाडी शहराचा पाणी प्रश्न निकाल निघणार असल्याचे प्रतिपादन जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सुहास बाबर यांनी केले.
आटपाडी येथील विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी माहिती दिली. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अमरसिंह देशमुख, विटा नगरपालिकेचे माजी नगरसेवक अमोल बाबर, आटपाडी बाजार समितीचे सभापती पै. संतोष पुजारी, युवा नेते दत्तात्रय पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
या नवीन पाणीपुरवठा योजनेमध्ये गळवेवस्ती, आयटीआय कॉलेज, लघु पाटबंधारे विभाग येथे प्रत्येकी एक टाकी व कोर्ट परिसरात दोन टाक्या उभारण्यात येणार आहेत. यामध्ये 284 किलोमीटर अंतराची अंतर्गत पाईपलाईन प्रस्तावित आहेत. त्याच बरोबर 120 केडब्लूपी चे सोलर पॉवर प्लांटची निर्मिती देखील करण्यात येणार आहे. पाईपलाईन करताना रस्ते किंवा अन्य नुकसान झाल्यास त्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे.
पुढे बोलताना सुहास बाबर म्हणाले, आमदार कै. अनिलभाऊ यांनी खानापूर मतदार संघाचा चौफेर विकासाचे स्वप्न पाहिले होते. त्यांच्या पश्चात मतदारसंघात विकास कामे होतील का? असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला होता. परंतु अनिलभाऊ यांच्या नंतर ही मतदार संघामध्ये निधीची कोणतीही कमतरता येणार नसून याबाबत मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी काळजी करू नये असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख साहेबराव पाटील, अॅड. धनंजय पाटील, युवसेना तालुकाप्रमुख मनोज नांगरे, बाजार समितीचे संचालक सुबराव पाटील, पिनु माळी, नाना माळी, हणमंत गळवे, जगन्नाथ लोखंडे, उत्तम बालटे, संतोष लांडगे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
अमरसिंहबापूंच्या एनओसीमुळे योजना मार्गी
आटपाडी शहराला दररोज शुद्ध पाणीपुरवठा बाबत अनिलभाऊनी शासनाकडे पाठपुरावा केला होता. यासाठी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांच्याकडून एका कामाबाबत ना हरकत प्रमाणपत्र ही आवश्यक होते. त्यांनी ते लगेच दिल्याने आज ही योजना मंजुरी झाल्याचे सुहास बाबर यांनी संगितले.