माणदेश एक्सप्रेस न्युज : सांगली : महाविकास आघाडीकडून सांगलीची जागा ठाकरे गटाला जाहीर करण्यात आली आहे. पण हा निर्णय आपल्याला पचनी पडणारा नाही, असे वक्तव्य काँग्रेस नेते माजी मंत्री आम. विश्वजीत कदम यांनी केले. विश्वजीत कदम यांनी सांगली जिल्ह्यातील काँग्रेसच्या सर्व नेते आणि पदाधिकाऱ्यांसोबत पत्रकार परिषद घेतली.
त्यांनी या पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडली. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सांगली जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ता आणि जनतेची भावना समजून घ्यावी. सांगलीच्या जागेबाबात फेरविचार करावा, अशी विनंती विश्वजीत कदम यांनी केली. यावेळी पत्रकार परिषदेला काँग्रेस कमिटीचे नेते विशाल पाटील, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विक्रम सावंत, काँग्रेस नेते ऋतुराज पाटील आणि इतर नेते उपस्थित होते.
यावेळी बोलताना विश्वजित कदम म्हणाले, सांगली जिल्ह्याच्या काँग्रेस पक्षाच्या काही नेत्यांनी कार्यकर्त्यांच्या आणि लोकांच्या भावनेखातर आम्ही पत्रकार परिषद घेत आहोत. आजची ही पत्रकार परिषद आम्ही जी जिल्हा काँग्रेस कमिटीतल्या असंख्या काँग्रेस कार्यकर्त्यांच्या विनंतीला मान देवून सांगली जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाच्या विचारधारेवर प्रेम करणाऱ्या तमाम कार्यकर्ते आणि नागरिकांच्या विनंतीला मान देवून, लोकांच्या तीव्र भावनांची कदर करत आम्ही ही पत्रकार परिषद घेत आहोत. आम्ही कुणाचेही प्रश्न घेणार आहोत. आम्ही फक्त आमच्या भावना मांडण्याचे प्रयत्न करत आहोत”, असे विश्वजीत कदम म्हणाले.
गेल्या काही महिन्यांपासून आपल्या देशात आणि महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशात इंडिया आघाडी आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या माध्यमातून लोकसभा निवडणुकीला सामोरे जाण्याकरता आम्ही सर्वजण एकत्रित आलो आहोत”, असं विश्वजीत कदम म्हणाले.
जागावाटपाची चर्चा चालू झाल्यापासून काँग्रेस पक्ष सातत्याने आणि सांगली जिल्ह्यातील काँग्रेसचे पदाधिकारी, सांगली जिल्ह्याचा इतिहास पाहता, सांगली जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे. त्यामुळे ही जागा काँग्रेस पक्षाला मिळावा यासाठी आम्ही सर्वांनी खूप प्रयत्न केले. आम्ही पक्षश्रेष्ठींना नागरिकांच्या भावना पोहोचवण्याचा मनापासून प्रयत्न केला आहे”, असं विश्वजीत कदम यांनी सांगितले.
आम्ही राज्यातील प्रमुख नेते आणि दिल्लीतील प्रमुखांना सांगली जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांच्या भावना सांगितल्या आहेत. आम्ही सातत्याने पक्षश्रेष्ठींच्या भेटी घेत होतो. काँग्रेस पक्ष सांगलीची जागा लढायला सक्षम आहे, ही भावना सातत्याने मांडली. कारण या सांगलीत काँग्रेसचे 2 आमदार आहेत. स्थानिक स्वाराज्य संस्थेत काँग्रेसची ताकद आहे. त्यामुळे आम्ही या जागेची मागणी पक्षश्रेष्ठींकडे केली”, अशी भूमिका विश्वजीत कदम यांनी मांडली.
महाविकास आघाडीकडून काल जागावाटप जाहीर करण्यात आली. सांगली जिल्ह्याची राजकीय परिस्थिती काय आहे, याची पुन्हा एकदा माहिती घ्यावी. सांगलीच्या जागेबाबत पुन्हा फेरविचार करावा, अशी आमची विनंती आहे. आमच्या भावना समजून घ्याव्यात. सांगली जिल्ह्याबाबतची बातमी आम्हाला सहजासहज पचनी पडली नाही. त्यामुळे येणाऱ्या दिवसांत आम्ही सांगली जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांची भेट घेऊन समजूत काढण्याचा प्रयत्न करु. यातून सकारात्मक मार्ग कसा निघेल? यासाठी प्रयत्न करु, असे विश्वजीत कदम म्हणाले.